गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (10:43 IST)

आता गड-किल्ल्यांवर मद्यपानाला बंदी

गड-किल्ल्यांचे पावित्र राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. गृहमंत्रालयाने अधिकृत शासकीय अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार, गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १०,००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.
 
महाराष्ट्रात सुमारे 350 गड-किल्ले आहेत. यांपैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू केली आहे. अध्यादेशाद्वारे किल्ल्यांवर मद्यमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले आहेत.
 
अध्यादेशानुसार, किल्ल्यांवर पहिल्यांदाच कोणी मद्यपान करताना आढळल्यास त्याला महाराष्ट्र दारुबंदी अभियान 1949 च्या कलम 85 नुसार 10,000 रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर दुसऱ्यांदा असा गुन्हा झाल्यास त्याला एका वर्षाचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 
 
ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर ‘मद्यपानास सक्त मनाई आहे’ असे इशारा फलक लावण्याचे आदेशही गृहमंत्रालयाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.