शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काय आहे राज्यात घडलेलं सोनई हत्याकांड ?

सोनई हत्याकांड
सवर्ण आणि मागासवर्गीय अर्थात आंतरजातीय  प्रेम प्रकरणातून सोनई येथे तीन सफाइ कर्मचारी तरुणांची सहा  जणांनी निर्घृण हत्या केली.  या प्रकरणातील सुरक्षेच्या कारणाने नगर येथे केस न चालवता, नाशिक कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली. या हत्याकांडातील राक्षसी क्रौर्याचे स्वरुप पाहता, सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी केली होती.
 
या हत्याकांडात नाशिकच्या न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा; अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुºहे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना नाशिकच्या कोर्टाने दोषी ठरविले होते. तर अशोक रोहीदास फलके रा. लांडेवाडी,सोनई यास दोषमुक्त केले होते. यापैकी सहा आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.
 
सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) सर्व रा. त्रिमुर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तीन तरूणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता.
 
या प्रकरणात मुख्य मृतक असलेल्या सचिन सोहनलाल घारू (२६) याची हत्या केल्या नंतर सर्व पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये त्याचे दोन मित्र त्यावेळी तेथे होते ते प्रत्यक्ष दर्शी होते त्या संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) दोघांना सुद्धा क्रूर पणे मारले गेले होते. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे चौकशी सुपूर्द केली. साधारणत: एका महिन्यात तपास पूर्ण होऊन २५ मार्च २०१३ रोजी सीआयडीने आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८२ पानांचे दोषारोपपत्र असून, ५३ साक्षिदारांचे जबाब नोंदवून त्यांची न्यायालयासमोर तपासणी झाली होती.
 
यामध्ये कोर्टासमोर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २२ असे परिस्थतीजन्य पुरावे सादर केले होते ज्यामुळे हे हत्याकांड कसे घडले ते सिद्ध झाले आहे. यातील प्रमुख मुद्दे असे की घटनेच्या अगोदर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनला आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. मयत सचिन धारू हा अनुसूचित जातीचा होता व तो त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कामाला होता व त्याच महाविद्यालयातील सवर्ण जातीच्या विद्यार्थिनीशी त्याचे प्रेम होते व दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता. मयत सचिन धारू हा सवर्ण जातीच्या मुलीशी विवाह करणार आहे याची पुरेपूर खात्री आरोपींना झाली होती. त्यामुळे असे होऊ नये त्यासाठी त्यांनी कट रचला, अशोक नवगिरे याला त्यासाठी पुढे करून सचिनचा मित्र संदीप धनवार याला खोटे कारण दाखवून बोलवून घ्यायचे, संदीपबरोबर सचिन धारू हादेखील येईल हे सर्व आरोपींना ज्ञात होते. हत्याकांड करताना आरोपींचा राग इतका टोकाला होता की त्यांनी सचिनच्या हात व पायाचे ८ तुकडे केले व ते पाणी असलेल्या खोल विहिरीत टाकले तसेच त्याचे शीर कापून धड कोरड्या विहिरीत बुजून टाकले. सचिनचा मित्र राहुल याचाही निर्घृणपणे खून करताना त्याच्या डोक्यावर घाव घातले.आरोपींनी अतिशय नियोजनपर्ण कट केला. सचिन व राहुल यांचा कोणताही पुरावा ठेवला नाही.सचिनचा मित्र संदीप याला संडासात उलटे टांगून त्याला गुदमरून ठार मारले आहे. हे सर्व सी आय डी तपासात उघड झाले होते. तर दुसरीकडे सवर्ण जातीची मुलगी फितूर झाली असली तरी, ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी घडली तोपर्यंत मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कॉलेजमध्ये शिकत होती. परंतु घटनेनंतर तिने कॉलेजला जाणे बंद केले. याबाबत तिला तिच्या शिक्षकांनी विचारले असता, ‘तिने आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे’ असे सांगितले आहे.
 
माणुसकी पेक्षा जाती व्यवस्था किती विघातक आहे हे पुन्हा समोर आहे. या प्रकरणातील मुलगी सीमा ही फक्त एकदा न्यायालयात साक्ष दिली होत. मात्र त्या नंतर तिने पुन्हा एकदा तिची साक्ष फिरवली आणि फितूर झाली. तीचे प्रेम तर गेलेच मात्र तिचे वडील आणि भाऊ इतर नाते संबंधातील लोक या नीच कृत्यामुळे प्रकरणात गुंतले गेले  आहेत. त्यामुळे सर्व बाजूने तिचे मोठे नुकसान झाले आहे. ती सध्या कोठे आणि काय करते हे मात्र तिच्या घरातील इतर सदस्यांनी गुप्त ठेवले आहे. या हत्याकांडातील तिचा प्रियकर सचिन सोहनलाल घारू याच्या छातीवर तिचे नाव कोरले होते हे तपास अहवालात नमूद आहे.
 
काय आहे सोनई तिहेरी  हत्याकांड
 
अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र जेव्हा सीमाच्या घरी हे कळले तेव्हा मात्र प्रकरणाला वेगळाच रंग आला. यातील सीमाच्या घरातील लोकांनी या तिघांना मारण्याचा कट रचला होता.
 
सीमाचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले (भाऊ), संदीप कुर्‍हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील शौचालयाच्या सेफ्टी टँक दुरुस्तीचा खोटे कारण समोर केले होते. सोबत कामाची अधिक रक्कम देतो असे सांगून संदीप थनवार, सचिन घारू व तिलक राजू कंडारे यांना 1 जानेवारी 2013 रोजी बोलावले. हीच वेळ त्यांनी साधली संशयितांनी अचानक हल्ला केला आणि संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून जागीच ठार करण्यात आले होते. हे सर्व पाहून पळून जाणार्‍या राहुल कंडारे याच्यावर कोयत्याने जबर  वार केले आणि ठार केले होते.  सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खून करण्यात आला होता. हे सर्व पोलीस तपासात स्पष्ट झाले.