शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जुलै 2014 (10:28 IST)

अस्मानी संकट

सहय़ाद्रीच्या कुशीत वसलेले माळीण हे गाव बुधवारी निसर्गाच्या अस्मानी संकटात पुणे जिल्हय़ाच्या नकाशावरून पुसले गेले. निसर्गाच्या   प्रकोपाने एका क्षणात होतचे नव्हते झाले. मुसळधार पावसात दरड कोळल्याने आठशे लोकवस्तीचे हे गाव ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्यामध्ये 44 घरांतील माणसे आणि अनेक जनावरे सापडली. दीडशे ते दोनशे लोक अडकल्याची  शक्यता वर्तविण्यात येत असली तरी प्रशासनाकडे तची निश्चित माहिती नाही. भीमाशंकरजवळील अतिशय दुर्गम भागात ही दुर्घटना घडल्याने मदत आणि बचावकार्य वेळेत पोहोचू शकले नाही. पाऊस चालूच असल्याने अडचणीत भर पडत असून प्रशासकीय यंत्रणेला निसर्गाने निष्प्रभ ठरविले. दहा ते पंधरा फूट उंचीचा मातीचा ढिगारा उपसलल्यानंतर त्यामध्ये नेमके किती लोक अडकलेत हे स्पष्ट होईल. सुरुवातीला दोन लोक गाडल्याचे सांगणत येत होते. नंतर ही संख्या पंचवीसपर्यंत वाढत गेली. 
 
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माळीण गावावर गेल्या चार-पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. तेथील लोकांना बुधवारची पहाट काळरात्र ठरली. झोपेत असलेल्या लोकांना हालचाल करण्याची कोणतीच संधी निसर्गाने दिली नाही. जे वाचले त्यांचे दैव बलवत्तर म्हणावे लागेल. एस.टी. चालकामुळे सकाळी ही घटना सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचली. त्यानंतरही प्रत्क्षात मदतकार्य सुरू होण्यास दुपारचे बारा वाजले. जर वेळेत बचावकार्य सुरू झाले असते तर कदाचित आणखी काहीजणांचे प्राण वाचू शकले असते. परंतु प्रशासनाला या घटनेचे गांर्भीय लवकर समजू शकले नाही. जेव्हा खरी माहिती समजली तेव्हा बराच वेळ झाला होता. डोंगरकडा कोसळल्याने संपर्क यंत्रणाही कोसळली. विजेची व्यवस्था ठप्प झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मदत कार्यावर स्वत: लक्ष ठेवून असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची यंत्रणा कामाला लागली आहे. सहानुभूतीसाठी आता अनेक मंत्र्यांचे दौरे सुरू होतील. 
 
सरकारकडून मदतीची घोषणा होईल. राजकीय पक्षांकडून याचे भांडवल केले जाईल. मात्र कडेकपारीत राहणार्‍या आदिवासींचे मूळ प्रश्न सोडविले जाणार नाहीत. या घटनेने उत्तराखंडमधील प्रकोपाची महाराष्ट्रातील जनतेला आठवण करून दिली. आतापर्यंत राज्यात डोंगरकडा कोसळण्याची घटना मुंबई आणि कोकणात घडत होत्या. मुंबईतील दुर्घटनेत अनेक लोकांना प्राण गमावावे लागले. ऐशआरामी जीवन जगण्यासाठी माणसाचे निसर्गावर अतिक्रमण होत असून त्यातूनच बेसुमार वृक्षतोड आणि डोंगराचे सपाटीकरण करून हिल स्टेशनवर बंगले बांधले जात आहेत. अति श्रीमंतांच्या हवशी जीवनशैलीमुळे सर्वसामान्यांचे मात्र प्राण जात आहेत. पर्यावरणाची हानी थांबविण्यात सरकार हतबल आहे. दुर्गम भागातील आदिवासींवर कोसळलेली ही नैसर्गिक आपत्ती असली तरी ती मानवनिर्मित आहे. निसर्गाचे संवर्धन आणि त्याचे जतन केले नाही तर अशा विनाशाला सामोरे जावे लागेल. माहिती तंत्रज्ञानाद्वारे माणसाने निसर्गावर कितीही मात केली तरी निसर्ग एका फटक्यात त्याचे नामोनिशाण मिटवितो. लेह, लडाख, उत्तराखंड आणि त्यानंतर माळीणमध्ये घडलेल्या निसर्गाच्या प्रकोपाचा मानवाने बोध घेऊन निसर्गाशी मैत्री करावी, यातच आपले भले आहे.